वैद्यकीय अधिकाऱ्यांची दुकानदारी
■ ग्रामीण रुग्णालये पडताहेत ओस
■ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या जिवाशी खेळ
धामणगाव रेल्वे शहरातील ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी शहरातच आपापली दुकानदारी थाटल्याने ग्रामीण रुग्णालय ओस पडले आहे. मागील काही वर्षात येथील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले खाजगी दवाखाने उभारून ग्रामीण रुग्णालयात मात्र त्यांच्या जागेवर तज्ज्ञांऐवजी भलतेच बाह्यरुग्ण विभाग सांभाळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह चार एमबीबीएस डॉक्टरांवर बाह्यरुग्ण, आंतररुग्ण व अपघात विभागाची जबाबदारी आहे. तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात असंसर्ग व संसर्गजन्य आजारावरील बहुतांश रुग्ण ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात येऊन उपचार घेतात. परिसरात घडणाऱ्या अपघातांच्या घटना, गळफास, सर्पदंश, विषबाधेचे किंवा अचानक विविध गुन्ह्यातील आलेल्या गंभीर जखमींना तत्काळ उपचाराची गरज असते. त्यासाठीच शासकीय रुग्णालयामध्ये शासनाकडून चोवीस तास सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे, मात्र शासनाच्या पगारासोबत खाजगीतील माया जमवता यावी, यासाठी येथील पगारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली स्वतः चे दवाखाने उभारले आहेत.
दरम्यान आंतर व बाह्यरुग्ण सांभाळण्यासाठी या डॉक्टरांनी प्रत्यक्ष स्वतः कर्तव्यावर न थांबता बीएएमएस, बीएचएमएस, शाळा आरोग्य तपासणी पथक, युनानी आयुष भारत योजनेतील आरोग्य
अधिकाऱ्यांना आपल्या जागेवर ठेवल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे अनेकदा तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार न मिळाल्याने रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची वास्तविकता समोर आल्याने डबल इन्कम मिळवण्याच्या नादात या डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब जनतेच्या जीविताशी खेळ चालवला आहे. सदर गंभीर प्रकारात नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधीक्षक कांचन रहांगडाले यांचासुद्धा सिंहाचा वाट असल्याचे दिसून येत असून गुरुवार व शुक्रवार त्यांची जबाबदारी असताना गुरुवारी त्या गैरहजर होत्या. त्यांच्या बदल्यात डॉ. भूषण थोरात यांच्यावर जबाबदारी दिल्याची माहिती मिळालीः मात्र प्रत्यक्षात तेसुद्धा हजर नव्हते, तर त्यांच्या बदल्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत नेमणूक असलेल्या कांचन अग्रवाल यांनी दिवसभर येणाऱ्या रुग्णांना उपचार दिले
यावेळी विषबाधेचे व इतर आकस्मिक आजाराचे रुग्ण त्यांनी हाताळले. वैद्यकीय अधीक्षक कर्तव्यावर नाहीत, तर कुठे आहेत व नाहीत तर मग वैद्यकीय अधीक्षक करतात तरी काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली. मागील काही वर्षात येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली दुकाने थाटून शासनाची दिशाभूल केली आहे. दरम्यान शहरात स्वतःचे मोठमोठी दुकाने उभारून रुग्णसेवेच्या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व सामान्य जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आरोग्य विभाग काय कारवाई करते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.